पुनर्निवडीबाबत राजकीय चर्चा, संपूर्ण माहिती साठी पूर्ण वाचा….
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधान परिषदेतील नऊ आमदारांचा कार्यकाळ येत्या काळात संपत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधान परिषदेवर जाणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
आगामी विधान परिषद निवडणुकीत भाजपप्रणीत महायुतीला संख्याबळाचा मोठा फायदा होण्याची शक्यता असून, याचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो, असे चित्र सध्या दिसत आहे.
मे २०२० मध्ये विधानसभेतील सदस्यांमधून हे नऊ आमदार बिनविरोध विधान परिषदेवर निवडून गेले होते. त्या वेळी महाविकास आघाडीला पाच, तर भाजपला चार जागा मिळाल्या होत्या. मात्र, सध्याच्या घडीला महायुतीकडे सुमारे २३५ आमदारांचे भक्कम संख्याबळ आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीतील पक्षांकडे एकत्रितपणे मर्यादित आमदारसंख्या आहे. दोन विधानसभा जागा सध्या रिक्त असून, मे महिन्यापूर्वी पोटनिवडणूक झाल्यास सर्व २८८ आमदारांना विधान परिषद निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळेल.
दरम्यान, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला नव्हता. त्यामुळे आता ते पुन्हा विधान परिषदेवर जाण्यास इच्छुक असतील का आणि महाविकास आघाडीकडून त्यांच्या नावाला एकमताने पाठिंबा मिळेल का, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.


Leave a Reply