बावधनमधील रस्त्याची अवस्था बिकट; PMC कडे तातडीच्या कारवाईची मागणी

खड्डे, उघडी गटारे, चिखल आणि वाहतूक कोंडीमुळे शालेय विद्यार्थी, पालक आणि स्थानिक रहिवाशांची गैरसोय; पुणे महानगरपालिकेच्या दुर्लक्षावर गंभीर आरोप.

bavdhan news

पुणे : पुण्याच्या बावधन परिसरात पायाभूत सुविधांचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. SNBP इंटरनॅशनल स्कूल आणि कोळते-पाटील Stargaze गृहप्रकल्पाकडे जाणारा महत्त्वाचा रस्ता अक्षरशः गायब झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे, साचलेले पाणी, उघडी गटारे आणि सर्वत्र पसरलेला चिखल यामुळे परिसरातील नागरिक, शालेय विद्यार्थी आणि पालकांना रोजच अडचणींचा सामना करावा लागत आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याची अवस्था इतकी खराब झाली आहे की डांबराचा लवलेशही उरलेला नाही. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांची खोली कळत नाही. त्यामुळे वाहनचालकांना मोठा धोका निर्माण होत असून, अनेक वेळा वाहने घसरल्याच्या आणि अडकण्याच्या घटना घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

रस्त्याच्या कडेला उघडी गटारे असल्याने परिस्थिती अधिकच धोकादायक झाली आहे. झाकणे नसलेल्या गटारांमुळे चिखल आणि घाण पाणी रस्त्यावर पसरत असून, पाऊस पडताच संपूर्ण मार्ग चिखलमय होतो. यामुळे दुचाकीस्वार, कारचालक आणि शालेय बसेसना येथे प्रचंड अडथळे येत आहेत.

दररोज SNBP Techno School मधील शेकडो लहान मुले या मार्गावरून प्रवास करतात. चिखल, खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे शालेय बस आणि ऑटो रिक्षा अडकण्याच्या घटना घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पालकांना देखील मुलांना सोडण्यासाठी किंवा आणण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, 10 मिनिटांच्या अंतरासाठी तब्बल एक तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागत आहे. रस्ता अरुंद आणि खराब झाल्यामुळे शाळेच्या सुट्टीच्या आणि प्रवेशाच्या वेळी मोठी कोंडी निर्माण होते. त्यामुळे अपघाताचा धोका अधिकच वाढल्याचे रहिवाशांनी सांगितले.

या दुरवस्थेमुळे केवळ वाहतूकच नव्हे तर आपत्कालीन सेवांवरही परिणाम झाला आहे. रस्त्याची अवस्था अशी आहे की रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाची वाहने वेळेत पोहोचणे कठीण झाले आहे. याशिवाय, खराब रस्त्यामुळे Ola, Uber, Blinkit आणि इतर डिलिव्हरी सेवा चालकही या परिसरात येण्यास नकार देत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

bavdhan image

स्थानिक नागरिकांनी पुणे महानगरपालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. PMC Care App, लेखी निवेदने आणि विविध माध्यमांतून केलेल्या मागण्या असूनही प्रशासनाकडून तात्पुरते पॅचवर्कच केले जाते, जे पहिल्याच पावसात वाहून जाते, असा आरोप नागरिक करत आहेत. कर भरूनही मूलभूत सुविधा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

रहिवाशांनी स्पष्ट मागणी केली आहे की संपूर्ण रस्त्याचे तातडीने डांबरीकरण किंवा काँक्रिटायझेशन करावे, उघड्या गटारांवर मजबूत झाकणे बसवावीत आणि शाळेच्या वेळेत वाहतूक सुरळीत राहण्यासाठी ट्रॅफिक पोलिस किंवा वॉर्डन तैनात करावेत.

दरम्यान, परिसरातील सोसायट्यांचे पदाधिकारी आणि पालकांनी इशारा दिला आहे की आठवड्याभरात रस्त्याचे काम सुरू झाले नाही, तर तीव्र जनआंदोलन किंवा रास्ता रोको करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी थेट संबंधित असलेल्या या प्रश्नाकडे प्रशासनाने आता तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Inline Article Ad 728x90