आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघात; संविधान, राम मंदिर, सीबीआय-ईडीवरून जोरदार टीका
मुंबई : भाजपवर थेट आणि तीव्र शब्दांत टीका करत आमदार आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापवले आहे. अयोध्या, वाराणसी, उज्जैन, संविधान, सीबीआय-ईडी आणि ‘लव्ह जिहाद’-‘लँड जिहाद’च्या मुद्द्यांवरून त्यांनी भाजपला लक्ष्य केले. एका कार्यक्रमात बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “खरे हिंदूद्रोही आणि खरे देशद्रोही हे भाजपवालेच आहेत.” राम मंदिराबाबत बोलताना त्यांनी भाजपवर मंदिराच्या मुद्द्यावरून राजकारण आणि श्रेय घेण्याचा आरोप केला. “राम मंदिर हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बनले. भाजपने ना शासन केले ना कायदा आणला, पण क्रेडिट घेण्याची त्यांची इच्छा आहे,” असे ते म्हणाले.

अयोध्या आणि वाराणसीवर निशाणा
आदित्य ठाकरे यांनी अयोध्येतील मंदिर प्रकरणावरून भाजपला सवाल केला. त्यांनी वाराणसीमध्ये कॉरिडॉरच्या नावाखाली अनेक मंदिरे पाडल्याचा आरोप केला. काली मातेचे मंदिरही यूपीमध्ये पाडण्यात आल्याचा दावा करत, मुंबईतील मुंबादेवी परिसरातही कॉरिडॉरच्या नावाने जमिनी हिरावून घेण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला विरोध केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
संविधानावरून गंभीर आरोप
भाजपला बहुमत नसतानाही देशातील संस्थांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. “भाजपचे स्वतःचे संविधान या देशात आणायचे आहे,” असे सांगत त्यांनी डीलिमिटेशनपासून संविधान बदलाच्या कथित प्रयत्नांपर्यंत अनेक मुद्दे उपस्थित केले. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाऐवजी वेगळे राजकीय संविधान लादण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावाही त्यांनी केला.
सीबीआय, ईडी आणि आयटीवर टीका
केंद्रीय तपास यंत्रणांवरही आदित्य ठाकरे यांनी बोचरी टीका केली. सीबीआय, आयटी आणि ईडी या भाजपच्या “पोपटांसारख्या” संस्था झाल्या असल्याचा आरोप त्यांनी केला. “सीबीआय चंपतराय किंवा मिश्रा यांच्या घरी का जात नाही,” असा सवाल करत त्यांनी तपासयंत्रणांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला.
‘लव्ह जिहाद’ आणि ‘लँड जिहाद’वर प्रत्युत्तर
भाजप नेत्यांकडून ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लँड जिहाद’चे मुद्दे पुढे केले जात असल्याचा उल्लेख करत आदित्य ठाकरे यांनी भाजपलाच याबाबत उत्तरदायी ठरवण्याचा प्रयत्न केला. उज्जैनमध्ये जमिनी लुटल्या गेल्याचा आणि तिथे भाजपच्या मुख्यमंत्र्यांचाच सहभाग असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच भाजपच्या जुन्या नेतृत्वाची तुलना सध्याच्या नेतृत्वाशी करत, आजचे चेहरे “मिक्सिंग” आणि “इथेनॉल मिक्सिंग”सारखे असल्याची खोचक टीका त्यांनी केली.
राजकीय तापमान वाढणार
आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. भाजपकडून यावर काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.