मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी 3 डबे? भाजप नगरसेविकेची मोठी मागणी
मुंबई लोकलमधील वाढती गर्दी आणि विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा प्रश्न लक्षात घेता भाजप नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी मोठी मागणी केली आहे. सकाळी 5 ते 11 या वेळेत विद्यार्थ्यांसाठी लोकलचे तीन डबे राखीव ठेवण्याची मागणी त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मात्र, आधीच गर्दीने फुलणाऱ्या लोकलमध्ये तीन डबे राखीव केल्यास इतर प्रवाशांवर काय परिणाम होणार? यामुळे रेल्वे प्रशासन यावर काय निर्णय घेणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

Ai Generated
मुंबई : मुंबईची लोकल म्हणजे शहराची जीवनवाहिनी. सकाळच्या गर्दीच्या वेळी लोकलमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची अक्षरशः झुंबड उडते. अशातच आता विद्यार्थ्यांसाठी लोकलमधील तीन डबे राखीव ठेवण्याची मागणी समोर आली आहे. भाजपच्या मुंबई महानगरपालिकेतील नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी यासंदर्भात थेट रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिलं आहे.
तेजस्वी घोसाळकर यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मुंबई लोकलमधील 12 पैकी 3 डबे राखीव ठेवण्याची मागणी केली आहे. विशेषतः सकाळी 5 ते 11 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांसाठी हे डबे राखीव ठेवावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कोणत्या लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी डबे?
मध्य आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा, यासाठी काही प्रमुख मार्गांवरील लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र डबे ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. चर्चगेट-डहाणू तसेच सीएसएमटी-डोंबिवली/आसनगाव मार्गावरील लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी हे डबे राखीव ठेवावेत, असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
लोकलमध्ये आधीच अनेक डबे राखीव
सध्या मुंबई लोकलमध्ये महिलांसाठी दोन डबे राखीव असतात. याशिवाय प्रथम श्रेणी आणि पार्सलसाठीही डबे राखीव असतात. त्यामुळे गर्दीच्या वेळेत उर्वरित डब्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी कोंबले जातात.
विशेषतः सकाळी आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते. अशा परिस्थितीत आणखी तीन डबे विद्यार्थ्यांसाठी राखीव केल्यास इतर प्रवाशांसाठी उपलब्ध डब्यांवरील गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मागणी मान्य होणार का?
विद्यार्थ्यांच्या प्रवासातील अडचणी कमी करण्याच्या उद्देशाने ही मागणी करण्यात आली असली, तरी मुंबई लोकलमधील आधीच असलेली गर्दी पाहता तीन डबे स्वतंत्रपणे राखीव ठेवणे कितपत व्यवहार्य ठरेल, यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
आता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे प्रशासन तेजस्वी घोसाळकर यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करणार का आणि विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र डब्यांचा निर्णय घेतला जाणार का, याकडे मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे.
कोण आहेत तेजस्वी घोसाळकर?
तेजस्वी घोसाळकर या मुंबई महानगरपालिकेतील वॉर्ड क्रमांक 2च्या भाजप नगरसेविका आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपने त्यांना निवडणुकीत उमेदवारी दिली आणि त्या चांगल्या मताधिक्याने विजयी झाल्या.