उपोषणादरम्यान सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली; सफदरजंग रुग्णालयात दाखल

जंतर-मंतर येथे 21 दिवसांपासून उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना प्रकृती खालावल्याने दिल्ली पोलिसांनी सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. या कारवाईला आंदोलकांनी विरोध केला असून, पेपरफुटी प्रकरण, नीट परीक्षा व शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरप्रकारांवर कारवाईच्या मागणीसाठी आंदोलन सुरूच आहे.

उपोषणादरम्यान सोनम वांगचुक Image

नवी दिल्ली : जंतर-मंतर येथे गेल्या 21 दिवसांपासून उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना शनिवारी सकाळी दिल्ली पोलिसांनी सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती खालावत असल्याने आणि वैद्यकीय उपचारांची गरज लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, पोलिसांनी त्यांना रुग्णालयात नेण्याच्या कारवाईला आंदोलकांनी विरोध केल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

सोनम वांगचुक हे कथित पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी, परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकारांवर कारवाई आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 21 दिवसांपासून अन्नत्याग करून उपोषण करत आहेत. सलग उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली असून त्यांचे सुमारे 9.5 किलो वजन कमी झाल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टरांकडून त्यांच्यावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.

या कारवाईनंतर 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी दिल्ली पोलिसांवर गैरवर्तन आणि मारहाणीचे आरोप केले. त्यांनी स्वतःही उपोषण सुरू करण्याची घोषणा करत केंद्र सरकारवर टीका केली. या घटनेनंतर आंदोलनस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि दिल्ली प्रशासनाला सोनम वांगचुक यांची दररोज वैद्यकीय तपासणी करून आवश्यक उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांच्या प्रकृतीवर नियमित देखरेख ठेवण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, वांगचुक यांच्यासोबत आयसा (AISA) संघटनेचे विद्यार्थी नेहा, अमीन आणि मनीष हे देखील उपोषण करत आहेत. नेहाला तीव्र हायपोग्लायसेमियामुळे रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला असून अमीन आणि मनीष यांची प्रकृतीही चिंताजनक असल्याची माहिती आहे.

शुक्रवारी रात्री प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ संदेशात सोनम वांगचुक यांनी उपोषणामुळे आपले सुमारे 20 टक्के वजन कमी झाल्याचे सांगितले. स्नायूंवरही परिणाम झाल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, आपले मनोबल अजूनही खंबीर असल्याचे सांगत त्यांनी 20 जुलै रोजी होणाऱ्या 'चलो संसद' आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.

वांगचुक यांनी आपल्या संदेशात पेपरफुटी, नीट (NEET) परीक्षा वाद आणि शिक्षण व्यवस्थेतील कथित अनियमिततेवर केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्यासंदर्भात ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी पुन्हा केली. या आंदोलनाकडे देशभरातील विद्यार्थी, शिक्षक आणि विविध सामाजिक संघटनांचे लक्ष लागले असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

Inline Article Ad 728x90